‘तेव्हा दिवाळीत कडाक्याची थंडी असायची. प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतं. आता ऋतूही बदलले आहेत आणि कपडे, दागिने, वाहने खरेदीचं अप्रूप राहिलेलं नाही; पण तरीही ती दिवाळी मराठी माणसाच्या अंतर्मनात पक्की बसलेली आहे...’ सांगत आहेत ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आणि लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे ....‘आठवणीतली दिवाळी’ या सदरात .....
........
माझ्या लहानपणी, साधारण मी आठ ते दहा वर्षांचा असताना पुण्याची लोकसंख्या पाच-सहा लाख होती. त्यामुळे दिवाळीलाही एक खास पुणेरी स्पर्श होता असे म्हटले तरी चालेल. आता पुण्यात परप्रांतीय, परदेशी लोकही मोठ्या संख्येने आले आहेत. कालानुरूप आता दिवाळी साजरी करण्यात खूप बदल झाले आहेत. पूर्वी पुण्यात मोठमोठे वाडे होते, तीस-चाळीस बिऱ्हाडे असायची, शेणाने सारवलेली अंगणे रांगोळ्यांनी सजलेली असायची. तिथे चुलीवरच्या हंड्यात पाणी तापत असायचे. महिला एकमेकांच्या घरी जाऊन फराळ तयार करायच्या. ते वातावरण वेगळेच असायचे. मंडईजवळ साखरे महाराजांचा मठ होता. तिथं काकड आरती व्हायची. सगळ्या महिला काकड आरतीला बाहेर पडायच्या. आकाशकंदील आजच्यासारखे असंख्य प्रकारचे नसायचे, ठराविकच आकाराचे असायचे. मंगलवाद्यं वाजायची. आता ‘दिवाळी पहाट’च्या सांस्कृतिक कार्यक्रमांशिवाय दिवाळी होत नाही की काय, असे वाटते.
मामाच्या गावाला जायचा कोण उत्साह असायचा. फार श्रीमंती नव्हती; पण दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या घरी जाऊन मजा करायची उत्सुकता असायची. मामाकडून एक शर्ट, हाफ पँट मिळायची, त्याची कोण अपूर्वाई असायची. कधी दिवाळी येतेय आणि कधी तो शर्ट, पँट घेतोय असे व्हायचे. दिवाळीत एकदाच नवे कपडे घेतले जायचे. श्रीमंती पैशाची नव्हती; पण मनाची श्रीमंती मोठी होती. त्या वेळी दिवाळीत जुनी सायकल विकत घेतली, तरी आई-वडिलांचा कोण अभिमान वाटायचा. त्याही परिस्थितीत आपल्याला सायकल घेऊन दिलीय याचा अभिमान, आनंद असायचा. आता घरटी दोन-चार वाहने असतात. त्यामुळे काही नावीन्य, अप्रूप उरलेले नाही. राजाला दिवाळी काय माहीत, अशी म्हण आहे, ती आताच्या काळात अगदी समर्पक ठरतेय.
भाऊबीजेला भाऊराया काय ओवाळणी घालणार याची बहिणींना उत्सुकता असायची. ती हुरहूर, कुतूहल कमी झाले आहे. आईचे नाते, वडिलांचे नाते याबद्दलची ओढ कमी झालीय. दिवाळीची मजा आता कमर्शियल होताना दिसतेय. आनंद हा अवचित मिळाला, की त्याची किंमत अधिक असते. तो आनंद मिळण्यातील अवचितपणा हरवलाय.
दूरदर्शनवरील माझ्या कारकिर्दीत अत्यंत अभिजात आनंद अनुभवला. त्या वेळी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. त्यावर दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रम करायचो. त्यात पंडित जितेंद्र अभिषेकी, मंगेश पाडगावकर, सुरेश भट हजेरी लावायचे. त्यांच्या कवितांमधून, गायनामधून दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हायचा. या कलाकारांच्या समृद्ध कलाकृतीचा आनंद घरबसल्या घेता यायचा. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असायची. त्यांना होणारा आनंद अवर्णनीय होता. आता मी दिवाळी बघतो, तेव्हा काहीतरी मिसिंग वाटत राहते. पूर्वी माणसांना एकमेकांना सोडवत नव्हते. आता दिवाळीच्या काळातही कित्येक लोक एकाकी असतात. आता नातेवाईक नको वाटतात. पूर्वी फार श्रीमंती नव्हती. मध्यमवर्गीय तर पिचलेला होता; पण तेव्हा माणसांमधील नाती घट्ट होती. काळानुरूप परिस्थितीत जमीन-आसमानाचा फरक पडला आहे. दिवाळी साजरी करण्याची पद्धत आता खूप बदलली आहे. ऋतूही बदलला आहे; पण दिवाळीचे मूळ रूप मराठी माणसाच्या अंतर्मनात पक्के आहे. ते कधीही बदलणार नाही.
(शब्दांकन : प्राची गावस्कर; व्हिडिओ : स्नेहा कोंडलकर)
(‘आठवणीतली दिवाळी’ या दिवाळी अंकातले सर्व लेख एकत्रितरीत्या येथे उपलब्ध होतील.)